व्हॉटस्अॅप आर्थिक सेवेच्या प्रतीक्षेत
दोन वर्षांनंतरही रिझर्व्ह बँकेची परवानगी नाहीवृत्तसंस्था, नवी दिल्लीव्हॉटस्अॅपच्या प्रस्तावित पेमेंट सेवेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही. व्हॉटस्अॅपवरून आर्थिक सेवा देण्याची परवानगी मिळावी यासाठी हे सोशल मीडिया माध्यम दोन वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने अद्याप ही परवानगी देणे टाळले आहे. भारतात डिजिटल आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेस चालना मिळत असल्याने आर्थिक व्यवहारांबाबत नवनवे पर्याय उपलब्ध होत आहेत. रिझर्व्ह बँकेने गुगललाही आर्थिक सेवेची परवानगी दिली आहे. यामुळेच व्हॉटस्अॅपने या सेवेच्या परवानगीसाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला आहे. व्हॉटस्अॅपचे सध्या २० कोटी यूजर असून, या सेवेच्या चाचपणीसाठी या मीडियाने १० लाख यूजरच्या खात्यांच्या माध्यमातून या सेवेची प्राथमिक चाचणी केली असून ती यशस्वी ठरल्याचा दावाही केला आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेकडून दोन वर्षांत काहीच उत्तर न आल्याने व्हॉटस्अॅपचे अध्यक्ष ख्रिस डॅनियल्स यांनी रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिले आहे. भीम यूपीआयच्या (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) माध्यमातून आम्हाला पेमेंट सेवेची तातडीने परवानगी द्यावी, अशी विनंती रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना मी पत्राद्वारे केली आहे. भारतभरातील आमच्या यूजरसाठी आम्हाला या सेवेची संधी दिल्यास एक उपयुक्त व सुरक्षित पेमेंट सेवा आम्ही पुरवू शकू आणि त्यातून डिजिटल धोरणाला बळही मिळेल, असे ख्रिस यांनी या पत्रात म्हटले आहे. पाच नोव्हेंबरला लिहिलेल्या या पत्रात आपल्या भागीदार बँकांचाही ख्रिस यांनी उल्लेख केला आहे. आमच्या भागीदार बँकांनीही आपणास याबाबत यापूर्वी लेखी विनंती केली आहे, असे यात म्हटले आहे. या सेवेची परवानगी मिळावी यासाठी आम्ही केंद्र सरकार, आरबीआय, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आदींच्या संपर्कात आहोत. अनेक बँकांशीही आमची चर्चा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया व्हॉटस्अॅपच्या प्रवक्त्याने दिली. ...सरकारची नाराजीपेमेंट सेवेची परवानगी मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अटींची आम्ही पूर्तता केली आहे. अशा प्रकारची सेवा देऊ इच्छिणाऱ्या सर्व माध्यमांबाबत एकच भूमिका असावी, अशी अपेक्षा व्हॉटस्अॅपने व्यक्त केली आहे. मात्र व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून पसरणाऱ्या खोट्या बातम्या व त्यांच्या दुष्परिणामांमुळे या माध्यमाने सरकारची नाराजी ओढवून घेतली आहे. व्हॉटस्अॅपवरील अफवांमुळे चालू वर्षात काही ठिकाणी झुंडबळीच्या घटनाही घडल्या आहेत. यानंतरही व्हॉटस्अॅपकडून सुरक्षेचे पुरेशी उपाययोजना केली जात नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2rj6y0G
from Maharashtra Times https://ift.tt/2rj6y0G
Post a Comment