माओवाद्यांच्या जबरदस्तीविरोधात आदिवासींचा विद्रोह
म. टा. प्रतिनिधी, नागपूरगडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान दुर्गम भागात बॅनर, पत्रके टाकून माओवादी आदिवासींना धमकावतात. पीपल्स गुरिल्ला आर्मी सप्ताहादरम्यानही हीच पद्धत माओवाद्यांनी अवलंबली. याला पाच गावांतील आदिवासींनी विरोध करीत माओवाद्यांच्या बॅनरची होळी केली. 'बळजबरीने नक्षल सप्ताह पाळण्यासाठी दबाव टाकल्यास याद राखा', असा इशाराही दिला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी; रविवारच्या या घटनेने दंडकारण्यात माओवाद्यांविरोधात वातावरण तापू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. माओवाद्यांचे केंद्रीय समितीचे नल्ला आदीरेड्डी, सीलम नरेश आणि संतोष रेड्डी हे कोय्यूरच्या जंगलात २ डिसेंबर १९९९ला चकमकीत ठार झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माओवादी दरवर्षी २ ते १० डिसेंबरदरम्यान विशेष सप्ताह साजरा करतात. बॅनर आणि पत्रके दुर्गम भागात टाकून सप्ताह पाळण्याचे आवाहन करतात. या सप्ताहादरम्यानही माओवाद्यांनी दुर्गम भागात बॅनर आणि पत्रके टाकली होती. मात्र पेंढरी पोलिस उपविभागांतर्गत येणाऱ्या पुलखल, पेंढारी, तारगुडा, जयसिंगटोला आणि येरकड येथील गावकऱ्यांनी माओवाद्यांच्या विशेष सप्ताहाला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. माओवाद्यांनी लावलेले बॅनर आणि पत्रके जाळून आपला रोष व्यक्त केला. अनेक वर्षांपासून माओवाद्यांनी आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेतला. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बाबतीत जगापासून कशापद्धतीने दूर ठेवता येईल हेच पाहिले. यापुढे माओवाद्यांना साथ देणार नाही. त्यांना आदिवासींचा विकास नको असून त्यांनी फक्त अत्याचारच केल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. आदिवासींची निर्घृण हत्या करणे, विकासकामांच्या ठिकाणी वाहनांची जाळपोळ करून भीती निर्माण करण्याचेच प्रकार माओवादी करीत आहेत. असल्या प्रकारांना आता आम्ही घाबरणार नाही. बळजबरीने भीती दाखवित नक्षल सप्ताह पाळायला लावल्यास याद राखा, असा स्पष्ट इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. यापूर्वी जुलै महिन्याच्या शेवटी शहीद सप्ताहात माओवाद्यांविरोधात एटापल्ली तालुक्यात अशाच पद्धतीचा रोष पहायला मिळाला होता. --गोंदिया जिल्ह्यात ३५ बसफेऱ्या रद्दगोंदिया : माओवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यात 'हाय अॅलर्ट' घोषित केले आहे. तर गोंदिया आगाराने माओवादग्रस्त भागातील ३५ बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. जिल्ह्यातील सालेकसा, दरेकसा आणि देवरी तालुक्यातील ककोडी, चिचगड या परिसरात अधूनमधून माओवादी कारवाया होत असतात. मात्र, पीएलजीए सप्ताहादरम्यान या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते. काळी-पिवळी व ऑटोची वाहतूक पूर्णपणे बंद असते. सुरक्षेचा उपाय म्हणून गोंदिया आगाराने सालेकसा तालुक्यातील मानव विकास योजनेच्या सात बसेस बंद केल्या आहेत. तर गोंदिया-डोंगरगड ही बससेवा केवळ सालेकसापर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. मलाजखंडची बसदेखील मधातूनच परत गोंदियाला येणार आहे. चांदसूरज, बंजारी, खोलगड, बिजेपार या गावातील प्रवाशांना सप्ताहादरम्यान बससेवेपासून वंचित राहावे लागणार आहे. माओवादग्रस्त भागातील बसेस रात्रीच्या वेळेस पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात येणार आहेत. --आदिवासींना शिक्षण, आरोग्य आणि इतर सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्याची आतापर्यंतची माओवाद्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांना आदिवासींचा विकास नको आहे. आता लोक स्वत:हून माओवाद्यांचा अत्याचाराविरोधात पुढे येत आहेत. विकासाला अटकाव करण्यासाठीच माओवादी जाळपोळ करीत आहेत. अंकुश शिंदेपोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परीक्षेत्र मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2rfUihx
from Maharashtra Times https://ift.tt/2rfUihx
Post a Comment