‘साई संस्थानचा निधी सरकारने पळवला’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईराज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्य कर्जबाजारी झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डीच्या साईबाबा संस्थानला भाविकांनी देणगीदाखल दिलेला पैसा राज्य सरकारने पळविला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.राज्यातील प्रकल्प करदात्यांच्या पैशातून होत असतात, पण सरकारला आर्थिक नियोजन नसल्याने केवळ चार वर्षांत या भाजप-शिवसेना सरकारने राज्यावर पाच लाख कोटींपेक्षा जास्त कर्जाचा बोजा करून ठेवला आहे. पुरवणी मागण्यांचा तर जागतिक विक्रम या सरकारने केला आहे. महालेखापालांनी या सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर ताशेरे ओढले असल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. सिंचनाकरिता मागील सरकारने दिलेल्या सुधारित प्रशासकीय मान्यतांवर बोट ठेवणाऱ्या भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत ६४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला.सरकारचा भाविकांनी देणगी म्हणून दिलेल्या देवस्थानांच्या पैशावर डोळा आहे. देवस्थानांवर स्वतःच्या पक्षाशी संबंधित लोकांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत मर्जीप्रमाणे निर्णय करून घ्यायचे, हे मोदी मॉडेल राज्यात सुरू आहे. रिझर्व्ह बँकेच्या पैशावरती मोदी सरकार ज्या पद्धतीने डोळा ठेवून आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील विविध देवस्थानांकडील पैशावर सरकारचा डोळा आहे. हे यातून स्पष्ट झाले आहे, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2rguS3i
from Maharashtra Times https://ift.tt/2rguS3i
Post a Comment