राज्यात पारा घसरला
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईरविवारी राज्यामध्ये किमान तापमानाचा पारा आणखी थोडा घसरून अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीहून कमी असल्याची नोंद झाली. कोकण विभागाला अजून अपेक्षित दिलासा मिळाला नसला तरी सांताक्रूझ, डहाणू आणि रत्नागिरी येथे सरासरीहून तापमान खाली उतरले. कुलाबा, अलिबाग येथेही तापमान सरासरीच्या आसपास होते. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान औरंगाबाद येथे १०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सांताक्रूझ येथे सरासरीहून ०.७ अंश सेल्सिअस तापमान कमी नोंदवले गेले. रविवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १९ अंश सेल्सिअस होते. विदर्भामध्ये अमरावती-गोंदिया-नागपूर-वर्धा-यवतमाळ, मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद-औरंगाबाद-परभणी, तर मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर- नाशिक-सांगली-सातारा-पुणे या शहरांमध्ये सरासरीहून कमी किमान तापमानाची नोंद झाली. सातारा येथे सरासरीपेक्षा २.५ अंश सेल्सिअस, परभणी येथे सरासरीपेक्षा २.२ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ येथे सरासरीपेक्षा २.३ अंश सेल्सिअस कमी किमान तापमान होते. त्यामुळे आता पहाटेच्या वेळी गारठ्याची वाढती जाणीव राज्यभरात होऊ लागली आहे. राज्यभरात इतर ठिकाणी किमान तापमान सरासरीहून फारसे अधिक नव्हते. फक्त चंद्रपूर येथे सरासरीहून २ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. लोहगाव, जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, सोलापूर, कुलाबा, अलिबाग, अकोला, ब्रह्मपुरी येथे किमान तापमान सरासरीहून ०.२ ते ०.९ अंश सेल्सिअस जास्त असल्याची नोंद झाली. येत्या चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये ऋतुमानानुसार भारताच्या वायव्य, पश्चिम, मध्य आणि पूर्वेकडे किमान तापमानात आणखी घट आढळून येण्याची शक्यता हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजात वर्तवण्यात आली आहे. पश्चिम ते वायव्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात हा बदल आढळून येईल. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2rifeV3
from Maharashtra Times https://ift.tt/2rifeV3
Post a Comment