आरोग्यमंत्र: यशाकडे जाण्याचा 'आनंदमार्ग'
डॉ. स्मिता देसाई, बालरोगतज्ज्ञनिसर्गानं बहाल केलेल्या स्थितींपैकी सगळ्यात महत्त्वाची स्थिती म्हणजे मुलगा किंवा मुलगी वयात येणं. प्रत्येक पालकांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण असतो. या क्षणापासून पालकांचं व मुलांचं नातं मैत्रीचं होतं. या सुखद अनुभवासोबतच त्यांची काळजीदेखील वाढते. किशोरवयातील मुलांची जगात संख्या २५ टक्के इतकी असते. वयाच्या १० ते २० वर्षांपर्यंतचा हा काळ. यात शारीरिक वाढीचा वेग वाढलेला असतो. शरीरामध्ये व्यक्तिमत्त्व घडण्याची प्रक्रिया याच वयात होत असते. या वयोगटाकडे आपण लक्ष केंद्रित केलं, तर पुढची पिढी जास्त सुदृढ आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या सरस होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.एकदा असंच एका कॉलेजमध्ये किशोरवयीन मुलांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. सहजपणे मी त्यांना विचारलं, तुम्हाला पुढं काय करायचंय? सगळ्यांचं उत्तर एकच, आम्ही जे करू, त्यात आम्हाला यशस्वी व्हायचंय! आता प्रत्येकाची यशाची परिभाषा वेगळी असू शकते. मार्गही वेगवेगळे असू शकतात. महत्त्वाचं काय असतं, की मला आयुष्यात काय करायचंय? काय केल्यामुळं मी आनंदी होणार आहे? माझ्या मते, यश व आनंद मिळणं ही एकाच सायकलची दोन चाकं असतात. दिशा प्रत्येकाला आपापली ठरवायची असते.अमेरिकेचे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मार्टिन सेलिगमन यांचं 'ऑथेण्टिक हॅपिनेस' हे निखळ आनंदावरचं एक पुस्तक वाचत होते. २० वर्षं संशोधन केल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं. निखळ आनंद विशद करताना त्यांनी त्याचे पाच भाग केले आहेत. पहिला भाग म्हणजे, साधी सकारात्मक जाणीव. यात येतं प्रेम. आनंदाचा उपभोग. दुसरा भाग म्हणजे, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींत रममाण होणे. उदा. पुस्तक वाचणं, खेळणं, गाणं इत्यादी. तिसरा भाग, नाते. तुमचे कुटुंब, मित्र, आजूबाजूचे लोक आनंदी असतील तरच तुम्ही आनंदी होता, असे डॉ. सेलिगमन सांगतात. चौथा भाग, जे करण्यात तुम्हाला खरंच अर्थ वाटतो, तेच तुम्ही केलं पाहिजे. आणि पाचवा भाग म्हणजे, कार्यभाग वेळीच साध्य करणे. तरच तुम्ही आनंदी होता. आता या साऱ्यांचं संतुलन राखण्यासाठी काय करायला हवं? लक्ष केंद्रित करायला हवं. दिवस-रात्र परिश्रम घेण्याची तयारी पाहिजे. कष्टांमुळे भविष्यकाळ चांगला होतो, असं उगाच म्हटलं जात नाही.आपलं ध्येय गाठताना अडथळे येणारच. या अडथळ्यांना आत्मविश्वासानं सामोरं जावं. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती उचलतात. काही जण फक्त आपले पाय ओले करतात. हे विश्व सर्वांसाठी सारखंच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचं. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करायला हवं. या ठिकाणी एक 'असामान्य माणसाची गोष्ट' सांगाविशी वाटते. श्रीकांत बोला हा एका खेडेगावी गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आला. तो जन्मत:च दृष्टिहीन. दृष्टिदोष जावा म्हणून नातेवाइकांनी नको नको ते सल्ले दिले. आईवडिलांनी मात्र ठरवलं, याला चांगलं शिकवायचं. पुढे हा दहावी, बारावीत पहिला आला. पुढे त्यानं अमेरिकेत 'एमआयटी' या प्रख्यात कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. भारतात परत आला. 'बोल्लण्ट इंडस्ट्रीज' ही कंपनी काढली. आज तो या चारशे कोटींच्या कंपनीचा मालक आहे. विशेष म्हणजे त्यानं त्याच्यासारख्या अनेकांना त्याच्या कंपनीत नोकरी दिली आहे. अशी पाहिजे जिद्द आणि हिंमत. मुलांनो, आपलं ध्येय ठरवा. मेहनत करा. संघर्ष करा. स्वत:वर विश्वास ठेवा. यशस्वी आणि आनंदी व्हा.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2zvDoQI
from Maharashtra Times https://ift.tt/2zvDoQI
Post a Comment